Maharashtra

राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई शहर, मुंबई उपनगर साठी फिरत्या बालस्नेही सहा पथकाचे लोकार्पण

मुंबई,दि.१३  : राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत असून त्याच अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर साठी सहा फिरत्या बालस्नेही पथकाचे लोकार्पण आज मंत्रालय प्रवेशद्वार येथे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव,महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल देवरे यावेळी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले, या प्रकल्पात बालस्नेही व्हॅन, काळजीवाहू, समुपदेशक आणि शिक्षकांसह सुसज्ज आहेत, रस्त्यावर सापडलेल्या मुलांची सुटका करून त्यांना जवळच्या स्वयंसेवी संस्था किंवा सरकारी शाळेत पोहोचवते.या केंद्रांवर, मुलांना शिक्षण, पुनर्वसन उपक्रम, पौष्टिक आहार आणि मानसिक-सामाजिक समर्थन मिळण्यास मदत होईल.फिरती पथक प्रकल्पाचा विस्तार करून, रस्त्यावरील मुलांची काळजी आणि संरक्षण वाढवण्याचे, त्यांना सुरक्षित आणि पालनपोषणासाठी आवश्यक ती साधने मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून रसत्यावर राहणारी मुले यांना देखील एक सुरक्षित वातावरण मिळून या मुलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण प्रयत्न आहे.राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास करण्यावर हे शासन भर देत आहे असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

राज्यातील रस्त्यावर राहणा-या मुलांची काळजी घेवून त्यांना सुरक्षित वातावरणात संगोपन करून शिक्षण देवून या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत या प्रकल्पासाठी ७२ लाख रूपयांची सहा महिन्यांसाठी तरतुद केली असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांसाठी हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे त्यातंर्गतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर साठी सहा फिरते बालस्नेही पथक नेमण्यात आले आहे.

प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाला मिळाले यश
* 40 हून अधिक मुले घेत आहेत शिक्षण: सचिव डॉ.अनुपकुमार यादव

फिरते बालस्नेही पथक या पायलट प्रोजेक्टला सुरुवातीच्या टप्प्यात यश मिळाले आहे. प्रत्येक आठवड्यात दोन हॉटस्पॉट क्षेत्रांचा समावेश करून ठाणे आणि नाशिकने हा प्रकल्प राबवला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील फिरती पथक मॉडेलचा प्रभाव खूपच् चांगल्या प्रकारे पडला आहे, ज्याने 40 हून अधिक मुलांना शैक्षणिक आणि सरंक्षण आधारित सहाय्य दिले आहे. परिणामी, या प्रकारे भिवंडीसारख्या इतर भागात ही फिरते बालस्नेही पथक सुरू करावे अशी मागणी वाढत आहे. या प्रकल्पाने रस्त्यावर राहणाऱ्या पालकांमध्ये वर्तणुकीतील बदल घडवून आणले आहेत आणि मनो-सामाजिक समर्थन आणि पुनर्वसन सेवांमध्ये प्रवेशाद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास सुलभ केला आहे. तज्ञांद्वारे व्यवस्थापित केलेल्या सतत ओळख आणि पुनर्वसन प्रक्रियेमुळे गरजू मुलांची ओळख वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *